पुणे : मे महिन्यातील जागतिक हृदयविकार जागरुकता महिन्यानिमित्त देशातील प्रमुख कार्डियोलॉजिस्ट्सनी भारतामधील लोकांच्या आरोग्यास धोकादायक असलेल्या हृदयविकाराकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली आहे. निदानाच्या एका वर्षाच्या आतच हृदयविकारामुळे जवळपास २३ टक्के भारतीय रुग्णांचा मृत्यू होतो.
हृदयविकार ही आरोग्यविषयक जागतिक समस्या बनली आहे. जगभरातील जवळपास २६ दशलक्ष लोकांना या आजाराचा धोका आहे. भारतातील जवळपास १० दशलक्ष लोकांना हृदयविकाराचा धोका आहे. या आजारामुळे आरोग्यासाठी कराव्या लागणाऱ्या खर्चामध्ये वाढ झाली आहे. सध्या दरवर्षाला जगभरात १०८ बिलियन डॉलर्स खर्च होत आहे. यामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष खर्चाचा समावेश आहे.
कार्डियोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे (सीएसआय) माजी अध्यक्ष डॉ. शिरीष हिरेमठ म्हणाले, ‘भारतात महामारी आजार म्हणून उदयास येत असलेल्या हृदयविकाराचे निराकरण करण्यासाठी प्रबळ दृष्टिकोन तयार करण्याची गरज आहे. भारतासारख्या कमी उत्पन्न असलेल्या देशांमधील मृत्यूदरामधील फरकासाठी कमी जागरुकता, आर्थिक भार, आरोग्यविषयक पायाभूत सुविधा, दर्जेदार प्राथमिक आरोग्य सुविधांची उपलब्धता, पर्यावरणीय व आनुवांशिक घटक यांसारखे घटक कारणीभूत असू शकतात. यामुळेच हृदयविकाराच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे.’
जामा कार्डियोलॉजीने प्रकाशित केलेल्या संशोधनातून निदर्शनास आले की हृदयविकारासाठी नवीन प्रगत उपचार पद्धती आठ महिन्यांपासून हृदयविकार असलेल्या रुग्णांना १० पैकी सात प्रकाराची शारीरिक व सामाजिक कामे करण्यामध्ये लाभदायी ठरल्या. विश्लेषणामधून नियमितपणे केलेल्या उपचाराचे सकारात्मक परिणाम दिसून आले. ज्यामुळे हृदयविकारापासून पिडित असलेल्या रुग्णांचा जीवनदर्जा सुधारण्यामध्ये मदत झाली:
हृदयविकाराने पिडीत सात हजारांहून अधिक लोकांचा अभ्यास करण्यात आला आणि त्यामधून निदर्शनास आले की प्रगत उपचार पद्धतीमुळे रुग्णांमधील मृत्यूदर व हॉस्पिटलचा खर्च कमी होण्यामध्ये मदत झाली; तसेच त्यांच्या जीवन दर्जावर देखील सकारात्मक परिणाम दिसून आला.
हृदयविकाराबाबत माहिती हृदयविकार व हृदयाघात यांसदर्भात अनेकदा गोंधळाची स्थिती निर्माण होते. हृदयाघात अचानक येतो. हृदयातील रक्तवाहिन्यांचे कार्य थांबल्यामुळे हृदयाघात येतो. यासाठी त्वरित वैद्यकीय उपचार मिळाला पाहिजे. हृदयविकार हा गंभीर स्वरूपाचा आजार आहे. या आजारामध्ये हृदयाच्या पंपिंग कार्यासाठी असलेल्या हृदयाचे स्नायू कमकुवत होतात किंवा ताठ होतात. परिणामत: हृदयामधून शरीराला होणाऱ्या रक्तपुरवठ्यामध्ये आणि इतर अवयवांना मिळणारे ऑक्सिजन व इतर पौष्टिक घटक यांमध्ये अडथळा निर्माण होतो. हृदयविकार म्हणजे हृदयाचे कार्य पूर्णत: थांबते असे नाही. हृदयविकार म्हणजे हृदय निकामी होणे असे नाही, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.